करोडो तेलुगु चित्रपटशौकिन ज्याला रुपेरी पडद्यावर देवासमान मानतात तो 'चिरूगारू' आता सामाजिक न्याय आणि गरिबी निर्मूलनाचा अजेंडा घेऊन राजकीय आखाड्यात उतरला आहे. २०० पेक्षा जास्त तेलुगु चित्रपटांमध्ये विविध भूमिका वठवणा-या ५३ वर्षांच्या चिरंजीवीच्या या नव्या भूमिकेत अनेकांना आशेचा नवा किरण दिसत असला, तरी आंध्रातल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू मात्र त्यामुळे सरकू लागली आहे.
चिरंजीवीच्या राजकारणातल्या एन्ट्रीमुळे २६ वषांर्पूर्वी आंध्रात अभिनयाकडून राजकारणात येऊन कलाटणी देणारे एन. टी. रामाराव यांच्या युगाची पुनरावृत्ती होईल का, प्रस्थापित राजकीय पक्षांची एकाधिकारशाही मोडून काढत करोडो चाहत्यांच्या जिवावर चिरंजीवी आंध्रातल्या बहुजनांचा नेता म्हणून पुढे येईल की बदलत्या राजकीय, सामाजिक-आर्थिक परिस्थितीत चिरूचा चार्म राजकीय आखाड्यात विरून जाईल, असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत.
प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली तेलुगु अभिनेते एन. टी. रामाराव यांनी १९८२ साली तेलुगु देसम पक्षाची (टीडीपी) स्थापना केली. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाने रामाराव यांच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये टीडीपीला मिळालेल्या घवघवीत यशाने रामाराव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आणि राज्यात काँग्रेसला एक मजबूत पर्याय निर्माण झाला. २६ वर्षांपूर्वी टीडीपीच्या स्थापनेच्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप फरक पडलाय. असं असलं तरी आंध्रातले सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, छोटे कामगार आणि महिलांचे प्रश्न आज अधिकच बिकट झाले हे मात्र खरे. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांची संख्या आंध्रात सर्वात जास्त आहे. २६ वर्षांपूर्वी आंध्रातला हाच वर्ग रामाराव यांच्या पाठीशी उभा राहिल्याने सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात आल्या होत्या. मात्र पुढे हळूहळू टीडीपीवर राज्यातल्या शक्तिशाली कम्मा (चौधरी) पुढा-यांचा प्रभाव वाढीला लागला आणि आज तो केवळ कम्मांचा पक्ष म्हणूनच ओळखला जातो. टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडूंच्या सत्तेच्या काळात राज्याची जनता किती त्रस्त झाली होती, हे २००४ सालच्या मतपेट्यांतून जाहीर झाले होतं.
आंध्र काँग्रेसवर पूवीर्पासून रेड्डी समाजाचं वर्चस्व राहिले आहे. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या राजकारणात जमीनदार रेड्डी सक्रिय असतातच. रेड्डींचे काँग्रेसवरचे वर्चस्व आजही शाबूत आहे. या राजकीय परिस्थितीत आंध्रात ५२ टक्के असलेल्या ओबीसी वर्गासाठी एकही प्रबळ नेता सध्या राज्याच्या राजकारणात अस्तित्वात नाही. त्यामुळे या वर्गासाठी म्हणून खास पक्षासाठी एक मोठी स्पेस आंध्रच्या राजकारणात गेली अनेक वर्षे अस्तित्वात आहे. ही राजकीय पोकळी पाहता राज्याच्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील मोगलतुरू गावात कापू (आंध्रात मुख्यत: अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, छोटे कारागीर असलेल्या कापूंची लोकसंख्या तीन कोटी आहे) या इतर मागासवर्गीय जातीत जन्मलेल्या चिरंजीवीला आंध्रच्या राजकारणात पाय रोवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसते.
आपल्या पहिल्यावहिल्या राजकीय संवादातच चिरंजीवीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच महात्मा जोतीबा फुले यांचे विचार आपल्याला मार्गदर्शक राहणार असल्याचे जाहीर केले. उत्तरेतील मायावतीनंतर फुल्यांच्या विचारांशी जवळीक साधणारा दक्षिणेत चिरंजीवी हा पहिला मोठा नेता मानला जात आहे. अशाप्रकारे थेट बहुजनवादी राजकीय प्रतिकांचा वापर करून आंध्रातल्या रेड्डी आणि कम्मा जातीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा त्याचा प्रयत्न दिसतोय. अखिल आंध्र प्रदेशात तुफान लोकप्रियता लाभलेल्या चिरंजीवीचं सर्वात मोठे बलस्थान हे त्याचे चाहते हेच आहेत. चाहत्यांनी स्थापन केलेल्या चिरंजीवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि फॅन क्लबचे जाळे संपूर्ण आंध्रात पसरलेय. रक्तदान, नेत्रदान यासारख्या शिबिरांमधून लाभ घेणारे कोट्यवधी लोक या ट्रस्टशी जोडले गेले आहेत. त्यामुळे यापुढे राजकीय संघटन करताना या फॅन फौंडेशनचा चिरंजीवीला नक्कीच लाभ मिळणार आहे.
प्रस्थापित राजकीय पक्षातील एखाद-दोन मोठे बहुजन समाजातील नेते चिरंजीवीसोबत गेले, तर येत्या निवडणुकांत तो निर्णायक भूमिका बजावू शकतो, असे मत हैदराबाद विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. कांचा इलय्या यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कापू समाजाची संख्या मोठी आहे. राज्यातल्या इतर मागासवगीर्यांमध्ये लोकप्रिय असलेले नवतेलंगणा प्रजा पार्टीचे देविंदर गौड चिरंजीवीसोबत जाण्याची शक्यता आहे. चिरंजीवी-गौड समीकरण तयार झाले तर आगामी निवडणुकांमध्ये किमान ९० विधानसभा तर १५ लोकसभा मतदारसंघांत चिरंजीवीचा पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकेल, असे ते सांगतात.
आंध्रच्या किनारी भागातल्या ईस्ट गोदावरी, वेस्ट गोदावरी, कृष्णा, गुंटूर आणि विशाखापट्टणम् जिल्ह्यांमध्ये चिरंजीवीचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या भागात त्याचे यश निश्चित मानले जातेय. मात्र राज्यातल्या इतर भागांतली जनता राजकीय नेता म्हणून त्याचे कसे स्वागत करील, हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी त्याच्यावर त्याचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
आपण स्वत: पक्के मानवतावादी असून राजकारणात प्रवेश करण्यासाठी आपल्याला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी प्रेरित केले असल्याचे तो सांगतो. मात्र तामिळनाडूत एम. जी. रामचंदन, करूणानिधी, जयललिता व आंध्रात रामाराव या लोकप्रिय अभिनेत्यांना राजकारणात मिळालेल्या यशामुळे दक्षिणेतल्या स्टार्सना राजकारणात येण्याचा मोह आवरता येत नाही, हे स्पष्टच आहे. डॉ. कलामांकडून प्रेरणा घेऊन आणि फुले-आंबेडकरी विचारांना मार्गदर्शक मानणा-या चिरंजीवीला आंध्रात मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम आणि दलित मतदाराचा पाठिंबा मिळेल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यत: हैदराबाद शहरात प्रभावी असलला मजलिसे इत्तेहादुल मुस्लेमिन पक्ष आणि राज्यात तुरळक भागात कार्यरत बसपा, कम्युनिस्ट पक्षांकडे या मतदारांचा झुकाव आहे. त्यामुळे हे दोन वर्ग आपल्याकडे ओढण्यात तो कितपत यशस्वी होईल, याच्यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्यातल्या काँग्रेस आणि टीडीपीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी कम्युनिस्टांनी दोस्तीचा हात आधीच पुढे केलेला आहे. हे पक्ष या आघाडीचे नेतृत्व चिरंजीवीकडे द्यायलाही तयार होऊ शकतात.
चिरंजीवीने आपल्या पक्षाची ध्येयधोरणे जाहीर करताना महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट मत जाहीर केलेले नाही. तिरुपतीच्या सभेत त्याने सामाजिक न्याय प्रस्थापित करून राज्यात बोकाळलेला राजकीय भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन दिलेय. मात्र धगधगता स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा आणि डोकेदुखी ठरलेला आंध्रातला नक्षलवाद या राज्याच्या राजकारणात ज्वलंत मानल्या जाणा-या मुद्यांना त्याने परत बगल दिलीय. असे असले तरी या दोन विषयांवर ठाम भूमिका घेतल्याशिवाय आंध्रच्या राजकारणात कोणत्याही पक्षाला पुढे जाता येत नाही याची जाणीव चिरंजीवीलाही नक्कीच असेल.
- हारिस शेख