जिथं कर्जबाजारीपणामुळे दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच राज्यात तब्बल २९ अब्जाधीश राहतात. हे परस्परविरोधी चित्र दुस-या कुठल्या राज्यातले नसून आपल्याच, महाराष्ट्रातले आहे....
फोर्ब्स मासिकाने नुकत्याच केलेल्या पाहणीत देशभरातील एकूण अब्जाधीशांपैकी २९ अब्जाधीश एकट्या महाराष्ट्रात राहत असल्याचं नमूद केलंय. भारतातल्या एकूण अब्जाधीशांजवळ असलेल्या संपत्तीत गेल्या एका वर्षात दुप्पटीनं वाढ झाल्याचेही या पाहणीत आढळलं. या पाहणीनुसार गेल्या वर्षी भारतात चाळीस अब्जाधीशांजवळ मिळून १७० अब्ज डॉलर एवढी संपत्ती होती. त्यात यावर्षी दुप्पट वाढ होऊन ती ३५१ अब्ज डॉलर एवढी झालीय. अबब... केवढी ही आकडेमोड आणि केवढी ही श्रीमंती.. आणि यातले अर्ध्याहून अधिक पैसा महाराष्ट्रात आहे. आपण ख-याखु-या आकड्यांविषयी बोलतोय की काही काल्पनिक गप्पा चालल्यात असा विचार करण्याची पाळी यावी असे हे भीषण वास्तव !
मराठमोळ्या महाराष्ट्रात एवढी श्रीमंत माणसे खरोखरच राहतात, यावर क्षणभर विश्वास बसणार नाही. पण जगभरातल्या धनिकांच्या प्रिय फोर्ब्स मासिकाची ताजी यादी हे वास्तव असल्याचे आपल्याला सांगते आहे. अब्जाधिशांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या जलदगतीने होत असलेल्या वाढीचेही द्योतक मानले जाते. मुंबई आणि पुणे या महाराष्ट्राच्या दोन शहरांमध्ये २९ अब्जाधीश व्यक्ती राहतात, असे फोर्ब्जच्या ताज्या यादीत सांगीतलेय. राज्याच्या दृष्टीने ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे ज्या राज्यात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, त्या राज्यात अब्जाधीशांच्या संख्येत आणि संपत्तीत अफाट वाढ होत आहे. आणि हे परस्परविरोधी चित्र दुस-या कुठल्या उत्तरेतल्या राज्यातले नसून आपल्याच, महाराष्ट्राचे आहे. अशा परिस्थितीत राज्यात नेमका विकास कुणाचा आणि फायदा कुणाचा होतोय, हा प्रश्नच आहे. फोर्ब्स मासिकाच्या यादीत श्रीमंत भारतीयांची संख्या वाढत असताना इथल्या गरिबांच्या संख्येतही झापाट्यानं वाढ होऊन अत्यंत वाईट अवस्थेत जगत असल्याचं जळजळीत वास्तवाकडे डोळेझाक करता येणार नाही.
शेअर मार्केटमधली तेजी आणि अर्थव्यवस्थेमध्ये आलेला बूम बघून अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, मात्र इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या केलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत २४ व्या क्रमांकावर आहे. अगदी आफ्रिकेतल्या इथियोपीया पेक्षाही भारतात गरींबांची वाईट दशा असून दिवसेंदिवस इथे भूकेल्यांची संख्या वाढत चालली असल्याचं या आकडेवारीतून दिसून आले आहे. महाराष्ट्राची विभागणी आता सरळ सरळ दोन बेटांमध्ये करावी लागणार आहे. एक अब्जाधीशांचे तर दुसरे गरीब, कर्जबाजारी आणि उपासमारी सहन करणा-यांचे. भौगोलिक दृष्ट्या दोन्हीं दरम्यान अंतर तसे फार नाही. मात्र आर्थिक दरी प्रचंड. ‘ ह्यांना ’ त्यांचे सोयरसुतक नाही. ‘ त्यांना ’ यांच्या जगाची माहिती नाही. सरकारी आकडेवारी नुसार दुष्काळ, प्रचंड गरीबी आणि कर्जबाजारीला कंटाळून गेल्या दहा वर्षात विदर्भात पन्नास हजार शेतक-यांनी आत्महत्या केलीय.
राज्याचे कृषी धोरण फसल्यानंतर सध्या इथल्या शेतक-यांची अवस्था अत्यंत वाईट अशी आहे. सततचा दुष्काळ, डोक्यावर वाढते कर्ज आणि भ्रष्टाचार यामुळे अनेकांना खेडी सोडण्याला पर्याय उरलेला नाही. श्रीमंत आणि गरीबांमध्ये एवढी प्रचंड दरी वाढलेली असताना आर्थिक वाढीचा वेग खरेच योग्य दिशेने जातोय का, हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आणि एकूणच देशात एवढ्या जलदगतीने श्रीमंती वाढत असेल तर निश्चितच गरीबांसाठी जीवघेणी अशी वाढ म्हणावी लागेल. समाजातली असमानतेत सतत वाढ होत चालल्याचं दिसते. इमारतीचा पाया ठिसूळ ठेऊन उंचच्या उंच टॉवर बांधण्याचा हा प्रकार वाटतो.

No comments:
Post a Comment