Sunday, September 7, 2008

अमुचा खुदा तो जगन्निवास, पंढरी नगरी विराजे

खुदाच्या सोबतीनेच विठ्ठलालाही भजणारे अनेक मुस्लिम संतकवी महाराष्ट्रात होऊन गेले. पण आज आपल्यासमोर येणारा इतिहास त्याची नोंद करत नाही. ती नोंद केली असती तर वेगळा राष्ट्रवाद शिकवण्याची वेळ कथित राष्ट्रवाद्यांवर आली नसती.
....
विठुमाऊलीच्या नामाचा गजर करत लाखो भक्त आषाढीला पंढरपूर नगरीत पोचले आहेत. पंढरी जगरीत जणू विठुरायांच्या भक्तांचा अफाट मळाच फुललाय. अख्ख्या मराठी समाजाला भक्तीरसात डुंबवणा-या या सोहळ्यात जात धर्माच्या भींती ओलांडून अनेक मुस्लिमही सहभागी होत असतात. अनेक मुस्लिम वारकरी यात सहभागी होत असतात. मुस्लिमांच्या विठुप्रेमाचा इतिहास तसा फार प्राचीन आहे. महाराष्ट्राचा गेल्या पाचशे वर्षाचा इतिहास पाहिला तर अनेक मुस्लिम संतकवी पंढरीच्या विठोबाच्या भक्तीरसात न्हावून गेल्याचे आपल्याला दिसते. मिळे संतांची मंडळी, वाजे स्वानंदाची टाळी किर्तनघोषाची आरोळी, पळे पळे पाहोनी भीमरथी दक्षिणतीरीं, परब्रम्ह उभे विटेवरी कर ठेवोनि कटांवरी, ध्यान दिगंबर साजिरें. धर्माने मुसलमान आणि संप्रदायाने महानुभाव असूनही मराठी जनमानसावर आपल्या चरित्रचारित्र्याचा आणि वाणीचा प्रभाव गाजवणारा संतकवी शहा मुनी यांनी पंढरीच्या विठुरायाचे केलेले हे वर्णन.
महानुभावापंथीयांचे पंढरी आणि पांडुरंगाविषयी असलेली गौणत्वाची भावना सर्वज्ञात असताना देखील शहा मुनींच्या मनातला प्रेम ठायी ठायी स्पष्ट झालेलं आहे. कलयुगात पापे फार झाल्यामुळे प्रभूने पंढरीची पेठ वसविली आणि त्या पेठेत होळी पेटवून तीत दोषांच्या गोव-या जाळल्या. पंढरी हा पापसागराला ग्रासून टाकणारा अगस्तीच आहे. किंवा भवसर्पाला छिन्नभिन्न करून टाकणारा गरुडच आहे, या शहा मुनीने केलेली भोवोत्कट प्रेरणेनेच वारकरी २१ व्या शतकातही पंढरीची पायवाट धरतात. मराठी संतमंडळीत ‘ मृत्युंजय ’ या नावाने ओळले जाणारे शहा मुंतोजी ब्रम्हणी हे मोठे मुस्लिम संतकवी होऊन गेले आहे. बिदर (कर्नाटक) येथे राजविलास भोगत असताना मुंतोजीच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारी एक घटना घडली आणि वैभवाचा त्याग करून ते अरण्याच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना पंढरपुराकडे जाणारी दिंडी भेटली. दिंडीबरोबर पंढरपुरात गेल्यावर तिथं टाळ, मृदंग वीणा यांच्या तालावर अनेक वारकरी गात-नाचत होते. या सगळ्यांकडे पाहून शहा मुंतोजी ब्रम्हणीचे चित्त वैराग्याकडे सहज आकर्षिले गेले. मुंतोजीला भक्तीची दीक्षा पांडुरंगाच्या चरणी मिळाली. पंढरपुरात आल्यानंतर कसे वाटले याचे वर्णन त्याने असे केले... ‘ बिजे भाजुनी लाह्या करणे, तैसे आम्हा येणे जाणे. आकारासी नाही ठाव, देही प्रत्यक्ष दिसे देव ’ .. मुंतोजी हा सूफी होता.हिंदू व मुसलमानी धर्मग्रंथातील तत्वे व विचार एकच आहेत, असे मुंतोजीने एका ग्रंथात लिहिले आहे. मुंतोजी यांनी ‘ स्वरूपसमाधान ’ , ‘ प्रकाशदीप ’ , ‘ सीताबोध ’ , ‘ पंचीकरण ’ सारखे अध्यात्मग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. टाळ मृदुंगाच्या तालावर एकरूप झालेले वैष्णव पाहून मुंतोजीच्या भक्तीची ही उन्मत्त अवस्थेचे आकर्षण वाटु लागते.
पंढरपूरला मुंतोजीला ‘ विवेकसिंधू ’ चे पुस्तक प्राप्त झाले. सहजानंदांनी गुरूपदेश केल्यावरमुंतोजीचे मृत्युंजय असे नाव ठेवले. ‘ अमुचा खुदा तो जगन्निवास, पंढरी नगरी विराजे ’ असे शहा मुंतोजीने पंढरीच्या विठोबाचा एके ठिकाणी वर्णन केला केला आहे. विवेकसिंधूद्वारे गुरूशास्त्र आणि सहजानंदासारखा सद्गुरू मुंतोजीला विठ्ठलाच्या कृपेनेच लाभला, असे त्याची चरीत्रकथा सांगते. विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचे बालरूप आहे, ही मराठी संतांची श्रद्धा मृत्युंजयानेही स्वीकारली.ज्याच्या मुखी वेणू आहे, जो पांडवांचा साह्यकारी आहे, जो द्रौपदीचा कैवारी आहे, तोच आनंदमय परमात्मा पंढरीत नांदत आहे, त्याचीच सेवा मृत्युंजय करीत आहे. अशी पंढरीच्या विठ्ठलाची स्तूती त्याने केली आहे.
मराठी संतांमध्ये ‘ कबिराचा अवतार ’ म्हणून ज्याची गणना केली जातो तो शेख महंमद हा एक प्रमुख मुस्लिम मराठी संतकवी होऊन गेला आहे. बीड जिल्ह्यात जन्मलेल्या या संतकवीचा कार्यकाळ इ.स. १५०० व्या शतकात होता. जनार्दनस्वामींचे गुरू दत्तावतारी चांद बोधले हे शेख महंमदाचेही गुरू होते. चांद बोधले हे सूफी साधू असल्यामुळे सूफी वेशात राहत होते. तेच चांद बोधले हे शेख महंमदांचेही गुरू होते हे उल्लेखनीय. शेख मोहम्मद हा कबिराच्या प्रकृतीचा असल्यामुळे त्याने तत्कालिन समाजात प्रचलित अंधश्रद्धांवर कोरडे ओढले. त्याचा राम हा कबिराप्रमाणेच व्यापक होता. राम नव्हे दाशरथी असे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्यामुळेच शेख महंमद हा देवदेवताच्या पसा-यावर कठोर हल्ला चढविताना दिसतो. पंढरी आणि पांडुरंग याविषयी त्याच्या हृद्यात भक्तिप्रेमाचा सागर हेलावताना दिसतो. शेख महंमदावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव त्याच्या ग्रंथातील विचारांवर आणि अभिव्यक्तीवर झालेला दिसतो. त्यांची भाषा ही विविध संस्कारांनी भारलेली आहे.तिच्या घडणीत आणि लोकाभिमुख स्वरूपात लोकसंस्कार आणि संस्कार यांचा मोठा वाटा आहे. परंतु शब्दांच्या सागराहूनही अधिक खोली अनुभूतीमुळे प्राप्त होते यावर त्यांचा विश्वास होता. शेख महंमदाच्या या विवेकदृष्टीची त्यांना किंमतही द्यावी लागली. कर्मठ मुस्लिम मात्र शेख महंमदावर खप्पा असायचे, ते त्याला ‘ काफर ’ म्हणून हिणवायचे. खालील उदगारातून त्याने आपल्या अंत:करणातील खळबळ व्यक्त केली आहे बाभळेच्या झाडा, आंबे आले पाडा अपरोक्ष निवाडा, शेख महंमद यति मुसलमान, म-हाटी वचने ऐकती आवडीने, विप्र शूद्र इंद्रावळी वेलीं खरबुजें पिकली ते भावें सेविली, सदाचारी मुसलमान याती, निपजली मती अधिकारी होती, अठरा पगड सतराव्या शतकाच्या पूर्वार्धाला हुसेन अंबरखान हे संतकवी होऊन गेले आहे.
दौलताबाद येथे अधिकारपदावर काम करणा-या अंबरखान याच्या अधिकार क्षेत्रात सर्वधर्मियांना धार्मिक आचरणासाठी मुभा होती असे त्याच्या चरित्र्यावरून दिसून येते. गीतेवर टीका लिहिण्याचे धनुष्यबाण उचलणा-या या मुस्लिम कवीने अगदी सोप्या मराठीत, गीतेच्या सौंदर्याला अगदी बाधा न पोहचवता, ओविबद्ध टीका केली आहे. गीतेचा भावार्थ हुसेन अंबरखान यांनी सोपा करून दाखवला आहे. अंबरहुसेनी नावाच्या या ग्रंथात ८७१ ओव्या असून ही गीताटीका समश्र्लोकी स्वरूपात लिहिली आहे. येथे न लिहिणे अव्ययार्थ, आणि संपूर्ण पदांचा अर्थ विचारूनिया वाक्यार्थ, तात्पर्यार्थ लिहिजे हे झाले महत्त्वाचे मुस्लिम संतकवी. पण अलमखान, तुकारामशिष्य अनग़डशाह बाबा, रामदासी केशवस्वामींचे शिष्य वाजीद पठाण, शहाबेग आणि शकीरगंज, जंगली फकीर सय्यद हुसेन, शहा हुसेन फकीर, सय्यद महंमद, शेख सली महंमद, लतीफशाह, शहा दत्त अलमाप्रभू अशा अनेक संतांची कामगिरी मोलाची आहे.
गेल्या शेकडो वर्षात मुस्लिम संतांची ही कामगिरी महत्वाची मानली जाते. ज्ञानाच्या आसक्तीने सुरू झालेली ही परंपरा सध्याच्या काळात अधिक जोमाने पुढे नेण्याची गरज आहे. नव्हे हा कारवॉं वाढवणे ही काळाची गरज आहे.

No comments: